वऱ्हाडी

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वऱ्हाड - याचा विस्तार, व्यापार, राज्यकारभार व शिक्षण वगैरेबद्दल माहिती ‘मध्यप्रांत व वऱ्हाड’ (विभाग १८) या लेखांत दिली आहे. त्याशिवाय बाकीची माहिती येथें देतों. याच्या उत्तरेस गाविलगड व मेळघाट आणि दक्षिणेस बालाघाट (अंजठापर्वत) आहे. पूर्वेस वर्धा नदी व पश्र्चिमेस खानदेश जिल्हा आणि निजामाचें राज्य आहे. या मध्यप्रदेशाचें जुनें नांव पाइनघाट होतें; आणि मेळघाट, पाइनघाट, व बालघाट हीं तीन नांवें या प्रदेशाचे तीन स्वाभाविक भाग निर्दिष्ट करतात. वऱ्हाड या नांवाची व्युत्पत्ति निश्र्चित नाहीं. महाभारतांत विदर्भ शब्द देश व राज्यवाचक आला आहे. रूक्मिणी, शिशुपालाशीं लग्न लागण्यापूर्वी उमरावती येथील अंबा देवीच्या मंदिरांत दर्शन घेण्याकरितां गेली, तेव्हां रूक्मीराजाबरोबर पुष्कळ वऱ्हाड होतें, त्यावरून हें ‘वऱ्हाड’ नांव पडलें अशी एक दंतकथा आहे. अबुलफजल यानें हा शब्द वर्धा (नदीचें नांव) व तट म्हणजे तीर यापासून आला आहे असें म्हटलें आहे. पाइनघाटावरील दक्षिणप्रदेशांत गाविलगडाच्या टेंकडया अतिशय उंच (३४०० फूट) आंहेत. बालाघाटावरील सपाट प्रदेश मेळघाटापेक्षां उंच नाहीं. मुख्य नध्या तापी, पूर्णा आणि वेनगंगा होत. वर्धा सातपुडयांत उगम पावून दक्षिणेकडे वाहात जाऊन ह्या प्रांताच्या आग्नेय भागातं वेनगंगेस मिळते. बालाघाटांत उगम पावून आग्नेयीस वाहणाऱ्या पूस, अर्णा, आणि वैदर्भ ह्या वेनगंगेस मिळतात. बुलढाणा जिल्ह्यांत लोणार नांवाचें एकच खारें पाण्याचें सरोवर आहे. पाईनघाटाच्या जवळील जमीन काळी असून कापसाच्या पिकास उत्तम आहे. यापेक्षां बालाघाट जास्त रमणीय व शोभायमान आहे; याची जमीन खोलगट असून झाडी बरीच आहे; मेळघाट सर्वात प्रेक्षणीय आहे; दरवर्षी यवतमाळ भागांत दोन अब्ज दहा कोटीं टन कोळसा निघतो. वणीपासून पापूरपर्येत १३ मैल व जुन्नरपासून चिंचोलीपर्येत १० मैल कोळशाच्या खाणी लागण्याचा संभव आहे. वऱ्हाडांतील हवा बहुतेक इतर दख्खनप्रमाणेंच आहे. फक्त बालाघाट व पाइनघाटाजवळची हवा फार उष्ण आहे. चिखलठाण येथें सानिटेरियम आहे. पाइनघाटापेक्षां बालाघाटांत व या दोहोपेक्षां मेळघाटांत जास्त पाऊस पडतो.

इतिहास- महाभारतांत रूक्मिणीच्या बापाचें व भावाचें विदर्भात राज्य होतें असें म्हटलें आहे. तसेंच विदर्भाचा उल्लेख नलदमयंती आख्यानांतहि आला आहे. विदर्भराजा भीम याची दमयंती ही कन्या होती. विदर्भ राज्याची राजधानी विदर्भ नांवाचें शहरच होंती. हें शहर हल्लीच्या निजामच्या मुलुखांतील ‘बेदर’ होय असें म्हणतात, व तें खरें असल्यास विदर्भ राज्य फार विस्तीर्ण होतें असें ठरतें. भागवतांत, बृहत्संहितेंत व नाशिकाच्या लेण्यांतील शिलालेखांत विदर्भ नांव येतें. वऱ्हाडचा खरा इतिहास आंध्र अथवा सातवाहन राजांच्या इतिहासाबरोबर सुरू होतो. त्यांच्या राज्यांमध्यें ह्याचा समावेश होत होता. ख्रि. पू. तिंसऱ्या शतकांत आंध्र लोकांनी गोदावरी व कृष्णा नदीच्या कांठचा प्रदेश व्यापिला होता. अशोकाच्या मुत्यूनंतर हे लोक जास्त प्रबल झाले व त्यांनी वऱ्हाडपर्येतचा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर हा प्रांत वाकाटक व आभीर उर्फ अहीर राजवंशाकडे होता. पुढें पुष्कळ कालपर्येत वऱ्हाडांतील महत्त्वाचे किल्ले अहीर (गवळी) राजांनीं ताब्यांत ठेविले; उदाहरणार्थ खानदेशांतील गवळीगड, मध्यप्रांतांतील अशीरगड व वऱ्हाडांतील गाविलगड. अहिरानंतर चालुक्य, नंतर राष्ट्रकूट, पुन्हां चालुक्य व देवगिरीकर यादव यांचा अंमल वऱ्हाडावर होता. पुढें अल्लाउद्दीन खिलजीनें १२९४ सालीं चंदेरी व एलिचपूरकडून दख्खनवर स्वारी केली.१३१६ सालीं देवगिरीच्या हरपाळदेवानें स्वतंत्रता धारण केली, म्हणून १३१७-१८ त मुबारकशहानें त्याला ठार मारलें व त्याचें राज्य खालसा केलें. अशा रीतीनें मुसुलमानांच्या ताब्यांत वऱ्हाड गेला. महंमद तुष्लकाच्या कारकीर्दीत वऱ्हाडास फार महत्त्व आलें होतें. १३४८ त बहामनी राज्य स्थापन झाल्यावर पुढें वऱ्हाड हा एक सुभा होता. त्यांत माहूर, रामगड व पाथरी यांचा समावेश होई. बहामनी राजांनी पुढें जीं युध्दें केलीं त्यांकरितां सैन्य वऱ्हाडांतून मिळत असे. १४७८ अथवा १४७९ सालीं वऱ्हाडचे राज्यकारभराकरितां दोन भाग झाले व ते आपल्या राजधानीच्या नांवानें प्रसिध्द आहेत: एक गाविल (उत्तारेकडील) व दुसरें माहूर (दक्षिणेकडील). याच वेळेस प्रांताच्या सुभेदाराचे अधिकार कमी होऊन सर्व महत्त्वाचे किल्ले किल्लेदारांच्या ताब्यांत आले. हे किल्लेदार खुद्द सुलतानच्या हाताखालचे असून त्यांचाच हुकूम पाळीत. पुढें गाविलगडाच्या सुभेदारानें १४९० सालीं स्वतंत्र होऊन आपल्या राज्यास माहूर जोडले; या सुभेदाराचें नांव इमादउल्मुल्क असून तो मूळचा कानडी हिंदु होता; त्याला वऱ्हाडच्या एका मुसुलमान सुभेदारानें विजयानगरच्या स्वारींत बाटविलें होतें. १५०४ त इमादउल्मुक वारल्यावर त्याचा मुलगा अल्लाउद्दीन गादीवर बसला; त्यानें गाविलगड राजधानी केली. १५२९ सालीं त्याच्यानंतर त्याचा मुलगा दर्याशहा त्याची कारकीर्द शांतपणें गेली. त्याचा मुलगा बुऱ्हाणशहा (१५६०-६१) याच्या वेळीं त्याचा प्रधान तुफालखाल यानें बंड करून त्यास नर्नाळा किल्ल्यांत कैदी केलें. १५७२ साली अहमदनगरच्या मुर्तुजा निजामशहानें बुऱ्हाणास सोडविण्याच्या मिषानें वऱ्हाडवर स्वारी केली व तुफालखान, त्याचा मुलगा आणि बुऱ्हाण यांनां पकडून ठार केलें. अशा रीतीनें वऱ्हांडातील इमामशाहीचा ८५ वर्षानंतर शेवट झाला. याप्रमाणें वऱ्हाड जरी निजामशाहीकडे गेलें तरी तिच्या आपसांतील भांडणामुळें १५९६ मध्यें सुलतान मुराद यानें वऱ्हाड जिंकून घेतलें. जरी वऱ्हाडांत वेगवेगळे राजे आले तरी त्यांनी पूर्वीची, परगण्यांतील व खेडयांतील वसून गोळा करणें ही व इतर हिंदूची राज्यव्यवस्थापध्दति कायम ठेविली; औरंगझेबानें मात्र पुष्कळ देशमुख, देशपांडयांनां वाटविलें. ते अध्याप गोमांस खात नाहींत व त्यांची नांवेंहि हिंदूसारखीं आहेत; मोंगलराज्यास वऱ्हाड जोडल्यानंतर मुरादानें बाळापुरापासून ६ मैलांवर शहापूर नांवाचें शहर वसविलें व तेथें आपला तळ दिला; व नवीन जिंकलेला प्रांत मोंगल सरदारांस वाटून दिला. १५९८ मध्यें मुरादच्या मृत्यूनंतर अकबरनें अहमदनगर जिंकल्यानंतर अहमदनगर, खानदेश, व वऱ्हाडची सुभेदारी दानियल यास दिली. त्याच्या मागें वऱ्हाड हें मलिक अंबरनें पुन्हां जिंकून निजामशाहींत दाखल केलें, पण शहाजहानच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी पुन्हां वऱ्हाड मोंगलांच्या ताब्यांत आलें. १६३६ मध्यें मोगलांच्या दख्खनच्या चार सुभ्यापैकीं वऱ्हाड एक होता तेव्हां त्याची राजधानी एलिचपूर व मुख्य किल्ला गाविलगड होता. या चार सुभ्यांचा सुभेदार औरंगझेब होता. तेव्हां मराठयांनीं वऱ्हाडवर बऱ्याच स्वाऱ्या केल्या व पुष्कळ खंडणी घेतली.

१६८० त संभाजी व १६९८ त राजाराम यांनीं देवगडच्या गोंड राजाच्या मदतीनें सर्व प्रांत उध्वस्त केला. मराठयांनां १७१८ त वऱ्हाडची चौथाई मिळाली. निजाम व खानदेशचा सुभेदार मुबारिझ यांची १७२४ च्या सुमारास साखरखेडलें येथें लढाई होऊन निजामचा जय झाला व तो दख्खनचा सुभेदार होऊन तेव्हांपासून वऱ्हाड त्याच्या ताब्यांत गेला. तो अध्यापपर्येत त्याच्याकडे (नांवानें) चालूच आहे. नागपूरकर भोंसल्यांनी सर्व प्रांतभर आपले अधिकारी ठेविले होते; त्याचें सैन्यहि तेथें होतें; तेच तेथील निम्में अधिकि उत्पन्न घेत. परंतु निजाम हा या वऱ्हाडंचा मालक म्हणून नेहमीं हक्क प्रतिपादीत असे; उग्दीरच्या लढाई नंतर (१७६०) मेहकर व दक्षिणेकडील कांहीं परगणे व खडर्याच्या लढाईनंतर (१७९५) उंबरखेड व कांहीं परगणे पेशव्यांनां मिळाले, निजाम आणि भोंसलें यांच्यामध्यें वऱ्हाडांतील वर्चस्वाविषयीं झटापट १७३७ मध्यें सुरू झाली तिचा १८०३ मध्ये शेवट झाला. त्यावेळीं वेल्स्कीनें गाविलगड घेतल्यानंतर भोसल्यांनीं तह करून वर्धा, गाविलगड आणि नर्नाळा यांच्या पश्र्चिमेकडील प्रदेशाचा हक्क सोडून दिला. १८०४ मधील हैदराबादच्या तहाप्रमाणें हा प्रदेश निजामकडे गेला. शिंध्याकडूनहि निजामाला सिंधखेड व जालनाच्या भोवतालचा प्रदेश परत मिळाला. यापुढें (१८०३-२०) पेंढाऱ्यांनी व भिल्लांनी वऱ्हाडास त्रास दिला. स. १८२२ च्या तहान्वयें वऱ्हाडची पूर्व सीमा वर्धा नदी ठरली व मेळघाटाजवळीक प्रदेश, वर्ध्याच्या पूर्वकडील प्रदेशाबद्दल आणि पेशव्यांच्या मुलुखाबद्दल निजामास परत मिळाला.
या सुमारास ‘पामर आणि कंपनी’ नें आपला पगडा निजामावर बसवला. मेटकाफू यानें तिच्याविरूध्द प्रयत्न केला तरी तो सिध्दीस गेला नाहीं. या कंपनीनें निजामाला वऱ्हाडांतील सैन्यखर्चाबद्दल शेंकडा २४ प्रमाणें कर्ज दिलें होतें. हैदराबाद येथील पूरणमल नांवाच्या मोठया सावकारानें वऱ्हाडांतील बहुतेक भाग धाऱ्यानें लावू घेतला होता; परंतु १८३९ मध्यें रेसिडेंटच्या आग्रहामुळें त्या हांकून देण्यांत आलें. पुढें पेस्तनजी कंपनी निघाली. हा कांहीं पारशी व्यापाऱ्यांनी काढलेली होती व १८२५-२६ मध्यें वऱ्हाडांतील कापूस मुंबईस नेण्याचें काम तिनें आरंभि कापूस पिकवणारास मोठमोठया रकमा त्यांनी दिल्या व खामगाव वगैरें ठिकाणीं कापूस दाबण्याचें कारखानें काढून निजामाच्या मुलुखांतील माल बाहेर नेण्याचें काम स्वीकारले. १८४१ मध्यें दिवाण चंदुलाल यानें संस्थानच्याकडे जें कर्ज होतें त्याच्या फेडीदाखल वऱ्हाडांतील वसुलाचें उत्पन्न दिले; परंतु १८४३ मध्यें त्या दिवाणानें राजीनामा दिला व संस्थानचें अगदीं दिवाळें वाजण्याच्या बेतांत आल्यामुळें पेस्तनजीस वऱ्हाड सोडावें लागलें. चंदुलालच्या गैरव्यवस्थेमुळें उत्पन्न कमी झालें. तेव्हां १८४३ त व पुढें इंग्रजी तैनातफौजेचा खर्च भागविण्यास इंग्रजसरकारास रोख पैसा ध्यावा लागला. पण १८५० पावेतों पुष्कळ बाकी सांचली; व १८५३ त ही बाकी व इतर बाबींचे मिळून इंग्रजासरकारचे एकंदर ५३ लाख कर्ज झालें. १८५३ मध्यें निजामाशी नवा तह होऊन इंग्रजसरकारास कर्ज फेडीदाखल ५० लाख वसुलाचा प्रदेश मिळाला. ह्याच मुलुखास हल्ली वऱ्हाड असें म्हणतात. या तहान्वयें खऱ्या वऱ्हाडाशिवाय धाराशिव व रायचूर दुआब हे जिल्हे इंग्रजांकडे जास्त आले. दर वर्षी हिशांब करून जास्त उत्पन्न झालें तर तें निजामास परत ध्यावें असेहि ठरलें. या तहामुळें निजामास हिशोब दरसाल देणें फार त्रासदायक व गैरसोयीचें झालें. व स. १८०२ च्या व्यापारी तहाप्रमाणें कर बसविण्यांत पुष्कळ अडचणी उत्पन्न झाल्या. याकरितां व १८५७ तील निजामच्या मदतीचें बक्षीस म्हणून १८६० मध्यें नवा तह झाला व निजामला ५० लाख रू. कर्जाची सूट देऊन सुरापूर, धाराशिव व रायचूर प्रांत दिले. उलट गोदावरीच्या दक्षिण तीरावरील प्रदेश त्यानें इंग्रजांनां दिला. व १८५३ प्रमाणेंच वऱ्हाडची व्यवस्था असावी असें कबूल केलें.

१८५७ च्या नानागर्दीत वर्‍हाड बहुतेक शांत होतें. स. १८५८ मध्यें तात्या टोपी सातपुडा पर्वतांत आला, व त्यानें दक्षिणेकडे उतरत जाऊन दख्खनमध्यें चळवळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु    वर्‍हाडमध्यें तो येऊन पोहोंचला नाहीं. जेव्हां इंग्रजांच्या ताब्यांत वर्‍हाड आलें तेव्हां शेतजमिनीची किंमत चढली. पुढें लगेच अमेरिकन यादवी (सिव्हिल वॉर) सुरु झाली व कापसाच्या पिकास  विलक्षण उत्तेजन मिळालें. शेतकर्‍यांनीं धान्य न पेरतां सर्वत्र कापूसच पेरण्याचा सपाटा लावला. तो मुंबईस (व तेथून परदेशांत) रवाना होई. कापूस परदेशीं फार जाऊं लागल्यामुळें बराच रोख पैसा व सोनें मोबदला मिळत असे. मालाची किंमत एकदम वाढून मजुरी वाढली व लोक श्रीमंत झाले. याच वेळेस रेल्वे लाईनीचें काम सुरु झालें. लागवडीची जमीन शेंकडा ५० नें वाढली व १८६७ पासून जमीनवसुलाचें उत्पन्न शेंकडा ४२ नें वाढलें. लोकसंख्या शेंकडा ८ नें वाढली. स.   १८६० नंतर पूर्वीप्रमाणें हैद्राबाद काँटिंजंट म्हणून वेगळें सैन्य संभाळणें खर्चाचें व निरुपयोगी ठरलें  व वर्‍हाडची व्यवस्था वेगळाच एक प्रांत म्हणून ठेवणें फार खर्चाचें होऊं लागलें. म्हणून १९०२ मध्यें निजामाबरोबर पुन्हां तह करण्यांत आला. यांत निजामचा वर्‍हाडवरचा हक्क पुन्हां शाबीत झाला   व त्यानें हिंदुस्थान सरकारला, दरसाल २५ लाख घेऊन वर्‍हाड कायमच्या वहिवाटीस दिला; यामुळें हिं. सरकारला या प्रांताची वाटेल तशी व्यवस्था करण्याचा अधिकार मिळाला. मात्र १८५३ च्या तहाप्रमाणें निजामचा मुलुख सुरक्षित ठेवण्याची अट राहिली. या तहान्वयें स. १९०३च्या मार्चमध्यें तैनाती फौज ही निराळें सैन्य गणलें न जाऊन हिंदी सैन्याचा एक भाग म्हणून समजण्यांत आली. व-हाड परत मिळण्याविषयीं सध्याच्या निजामानें बरीच खटपट केली पण त्याला यश आलें नाहीं. आज हा प्रांत मध्य प्रांताला जोडण्यांत आलेला असून मध्यप्रांताच्या गव्हर्नराच्या अधिकारांत हा प्रदेश आहे. तथापि कायदेशीर रीतीनें व-हाड अद्याप परकीय मुलुख म्हणूनच गणला जातो. व-हाडचें एकंदर उत्पन्न सुमारें दोन कोटी असून खर्च सव्वा कोटीचा आहे. वर्‍हाडच्या वसूलांतील शिलकीचा उपयोग मध्यप्रांताच्या खर्चाकडे होतो, त्यामुळें वर्‍हाडांत  मुळींच सुधारणा होत नाहीं अशी वर्‍हाडी लोकांची ओरड होऊं लागल्यामुळें सध्यां वर्‍हाड मध्यप्रांत  इलाख्याच्या  खर्चाच्या रकमेंतील शें. ६२ मध्यप्रांताकरिंता व शें. ३८ वर्‍हाडाकरितां खर्च करावेत  असें ठरलें आहे. (इं.गँ. काळे – वर्‍हाडचा इतिहास.)

Comments

Popular posts from this blog

अग्निकुल सिद्धांत के अनुसार #चार #क्षत्रिय #राजपूत_कुलों

कर्नल जेम्स टोड द्वारा गुर्जर शिलालेखो का विवरण